पुणे: अखेर मान्सून (Mansoon) अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. जवळपास आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात झाला आहे. पुढील 2 दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमान वाढीमुळे सर्वांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र, अखेर मान्सून दाखल झाल्याने उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
अंदमानच्या समुद्रात आज मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. नैऋत्य मॉन्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. सहा दिवस आधीच 16 मे रोजी मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. मात्र त्याआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये 18 मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 16 ते 19 मे दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातार, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.