मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यात भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. याचवेळी संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी भूमिकेवर आक्रमकपणे टीका केली आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना स्थापन झालेलं हे सरकार बेकायदेशीर असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी शिंदे सरकार घटनाबाह्य असल्याचं राऊत म्हणाले. या संदर्भात शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांनी राज्यपालांना पत्र दिलं आहे. यात राज्यपालांनी इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये, असं लिहलं आहे. 39 आमदारांवर कारवाईचे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याचा या पत्रात उल्लेख केला आहे. राज्यातील सरकार बेकायदेशीर असून मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ देखील बेकायदेशीर आहे. जर मंत्र्यांनी शपथ घेतली तर तो घटनाद्रोह होईल, असं राऊत यावेळी म्हणाले. तर दुसरीकडे शिंदे गटाला दिलासा मिळाला असं म्हणणं असं चुकीचं आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असंही राऊतांनी सांगितले.