
मुंबई, 30 जून : शिवसेनेचे बंडखोरे नेते एकनाथ शिंदे यांनी आज अखेर भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. त्यांनी आज संध्याकाळी राजभवनातील दरबार हॉलमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर नव्या सरकारचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रालयात दाखल झाले. मंत्रालयात शिंदे सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे पहिल्याच मंत्रिमंडळात शेतकऱ्यांच्या विषयांवर चर्चा झाली.
नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांनी राज्यातील खरीप हंगाम पीक, पाणी. पीक विमा तसेच कोबी बाबतची परिस्थिती याबाबतची माहिती देणारं सादरीकरण केलं. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सध्याची परिस्थिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
राज्याच्या नव्या सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत विशेष अधिवेशनाचा निर्णय घेतला. राज्य सरकारने आता महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. हे अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
दरम्यान, या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून महत्त्वाचं विधान केलं. “आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही राज्यातील विकास कामे विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते ही एका रथाची दोन चाके आहेत लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गती किमान शासन प्रशासन आहे. असा संदेश जाणे मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे”, असं एकनाथ शिंदे हे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना म्हणाले.